Saturday, 30 January 2016

स्नेह ज्योती-अंध विद्यालय व असोंड आश्रम शाळा- खेड सदिच्छा भेट

"फँड्री फाउंडेशन" चे सुरवातीपासूनचे एक मुख्य हितचिंतक श्री. अजय बिरवटकर प्रमुख सल्लागार असलेल्या खेड (रत्नागिरी) भागातील "स्नेह ज्योती' या अंध विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासी शाळेला भेट देण्याची संधी अजय दादांनी "फँड्री फाउंडेशन" च्या स्वयंसेवकांना दिली आणि ती अतिशय आनंदाने स्वीकारली. "फँड्री फाउंडेशन" च्या मुंबईतील २५ व रत्नागिरी टीमच्या २ स्वयंसेवकांनी या संधीचा लाभ घेतला.
२५ जानेवारी २०१६ रोजी आम्ही सकाळी १०.३० च्या सुमारास खेड मंडणगड रस्त्यावरील घराडी या गावातील "स्नेहज्योती" या अंध मुलांच्या निवासी शाळेत पोहोचलो. सुरवातीलाच एक सूचना फलक दिसला त्यातील सूचना व्यवस्थित वाचल्या कारण आम्ही साधारणपाने जे काम करायला आदिवासी पाड्यात जातो त्यापेक्षा हे काम वेगळे होते. मुख्य म्हणजे आम्ही येथे काही शिकवायला किंवा द्यायला आलो नव्हतो तर एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय नसलेल्या परंतु तरीही त्याची उणीव जाणवून न देणाऱ्या अशा बालवीरांकडून शिकण्यासाठी, त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासाठी आलो होतो. ज्या गोष्टी आपल्या कडे नाहीत त्याचे दुखः कवटाळून बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा कसा वापर करावा ही गोष्ट या मुलांकडून शिकण्यास मिळाली. आपल्याकडे असलेल्या Resources चा पुरेपूर उपयोग कसा करावा आणि आपले काम पुढे कसे न्यायचे याचा विचार करण्यासाठी ही बाब खूप महत्वाची आहे. ४ तासांच्या सहवासामध्ये त्यांच्या निरागस चेहेऱ्यावरील निरागस स्मित आपल्याला आपल्या आयुष्यातील दुखः किती शुल्लक असतात याची जाणीव करून दिली. दृष्टी असून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची दृष्टी आपल्यात नाही याची जाणीव झाली.
आशाताई कामत यांचा वयाच्या ७४ व्या वर्षी काम करण्याचा जो उत्साह आहे तो आमच्यासाठी निश्चितच स्फूर्तीदायक होता. शाळेतील सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापिका सेनगुप्ता यांची निरालस सेवा आपल्या सर्व स्वयंसेवकांमध्ये एक सकारात्मक बदल घडवेल याची निश्चिती.
२६ जानेवारी ला सकाळी १०.३० च्या सुमारास राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमात आयोगाचे अध्यक्ष असलेल्या माननीय दादासाहेब इदाते संचालित असोंड येथील आश्रम शाळेला आमचा स्नेही नंदेश खेडेकर याच्यामुळे योग आला. या शाळेत भटक्या जमातीची सुमारे १३५ मुले व मुली शिक्षण घेत आहेत. या मुलांचा सभाधीटपणा लगेच लक्षात येत होता. अनोळखी व्यक्तीशी बोलताना जो एक बुजरेपणा असतो तो नावालाही नव्हता. आमच्या स्वयंसेवकांबरोबर त्यांची लगेचच गट्टी झाली.
त्यांच्या बरोबर २ तास कधी संपले ते लक्षात देखील आले नाही.
या भेटीच्या तयारीची जबाबदारी दिलेल्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पू (पूनम यादव) हिने तिच्यावर सोपवलेली जबाबदारी अतिशय उत्कृष्टतेने पार पाडली. तिच्या कामाचे एका इंग्रजी म्हणी द्वारे वर्णन करेन "Talk Less Do More"

आपल्या अमोघ वकृत्व शैली आणि ज्ञानाने आम्हाला या मुलांच्या विश्वाची माहिती करून देण्याऱ्या स्नेह ज्योतीचे सचिव म्हणून काम पाहणारे माननीय श्री उत्तमकुमार जैन यांचे विशेष आभार

शेवटी महत्वाचे - आम्हाला ही संधी देणाऱ्या आमच्या लाडक्या अजय दादांचे आमच्यावरील प्रेम असेच वृद्धिंगत होवो.





Monday, 16 November 2015

सरत्या वर्षातील फँड्री फाऊंडेशनच्या कामाचा आढावा



वर्ष २०१५ मध्ये मार्च महिन्यात फँड्री फाऊंडेशनला नोंदणीकृत बिगर शासकीय संस्था म्हणून मान्यता मिळाली.
जून महिन्यात "Project Hope" आशा उज्वल भविष्याची हा आदिवासी विभागातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरज काही प्रमाणात पूर्ण करण्याचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे पाठबळ लाभले आणि परिणाम स्वरूप डहाणू ( कोटबी ), इगतपुरी (कुरुंग वाडी), कोल्हापूर (धोंडेवाडी), रत्नगिरी( कोळके वाडी) या गावातील अंदाजे ५०० विद्यार्थ्याना वर्षभर पुरेल इतके शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
जुलै महिन्यात आमच्या एक मुख्य आधारस्तंभ असलेल्या डॉ. अलका मांडके (आमच्यासाठी अलका मावशी) यांनी शहापूर येथील टेंभूर्ली या गावातील इयत्ता १० च्या सुमारे प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांकडे शालेय पुस्तके नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर आमच्या स्वयंसेवकांनी आठवड्याच्या आत सर्वच्या सर्व म्हणजे १०० सेट्स जमवण्यात यश मिळवले यामध्ये आमच्या मृणालिनी न्यायनिर्गुणे रेश्मा भोवर या दोन स्वयंसेविकांची कामगिरी मोलाची होती. तसेच आमच्या रत्नागिरी टीम ने समाजातील वेगवेगळ्या उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून चिपळूण मधील कोव्यास संचलित "जिद्द" या गतीमंद मुलांच्या शाळेतील आपल्या बालमित्रांसाठी आवश्यक असणा-या शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २७ जुलै रोजी फँड्री फाऊंडेशन Web-Site चे खालापूर येथे झालेल्या स्वयंसेवकांच्या शिबिरात उद्घाटन करण्यात आले.
१५ ऑगस्ट चे औचित्य साधून तळोजा येथील परमशांतीधाम या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मुंबई दर्शन घडवण्यात आले आणि त्यांना लागणाऱ्या औषधांचे तसेच इतर साहित्याचे आश्रम व्यवस्थापनाला वितरण करण्यात आले, या उपक्रमाच्या निमित्ताने Cognizant IT कंपनीचे कर्मचारी फँड्री फाऊंडेशनशी जोडले गेले.
सप्टेंबर महिन्यात गणरायांचे आगमन आणि महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती यावर फुंकर घालण्यासाठी फँड्री फाऊंडेशनतर्फे मदत निधी उभारण्यात आला आणि यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील वाणेगाव येथे गेले या गावातील शेत मजुरांसाठी घरटी शेंगदाणे, गोडेतेल, साखर तुरडाळ प्रत्येकी किलो तसेच कपड्याचे साबण एक अंघोळीचा साबण असे साहित्य २१ कुटुंबांना गाई गुरांसाठी 55 टन चारा वितरण केले
त्यानंतर नोव्हेंबर मध्ये फँड्री फाऊंडेशनचा गेल्यावर्षीचा बहुचर्चित उपक्रम "एक करंजी मोलाची" या उपक्रमाची तयारी सुरु करण्यात आली. या उपक्रमांतर्गत आम्ही कार्यरत असलेल्या डहाणू, इगतपुरी या गावातील आदिवासी पाड्यांवर फराळ वितरण करून दिवाळी साजरी करण्यात आली, कोल्हापूर टीमने भैरीबांबर या दुर्गम भागातील समाजापासून दूर असलेल्या लोकांबरोबर दिवाळी साजरी केली आणि रत्नागिरी टीम ने कोळकेवाडी तील कातकरी बांधवांबरोबर दिवाळी साजरी केली. या उपक्रमाच्या निमित्ताने Navin Flourine International या आंतरराष्ट्रीय कंपनीचे कर्मचारी फँड्री फाऊंडेशनशी जोडले गेले. तसेच हेरंब ढोलताशा पथक, शिवडी या शिवडी येथील तरुणांच्या पथकाने आपली सामाजिक जाणीव दाखवून उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले
डिसेंबर जागतिक ऐडस दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील शिये या गावातील ऐड्स बाधित मुलांच्या आश्रमाला E- Learning ची सुविधा उपलब्ध करून दिली जेणेकरून त्यामुलाच्या शिक्षणात व्यत्यय येवू नये. तसेच आमच्या रत्नागिरी टीमने मातृमंदिर या देवरुख मधील मुलींच्या आश्रमातील त्यांच्या राहण्याच्या खोल्यांची रंगरंगोटी करून त्यांच्या खोल्यांना एक प्रसन्न स्वरूप देण्याचा प्रयत्न केला
प्रिंट मिडीयाने योग्य ती प्रसिद्धी दिल्यामुळे आमच्या सर्व स्वयंसेवकाच्या झोकून देवून काम करण्याच्या वृत्तीमुळे या सर्व कामांसाठी निधी उभा करणे कठीण गेले नाही.
आपले आमच्या सर्व स्वयंसेवकांचे आणि हितचिंतकांचे असेच पाठबळ आम्हाला येणाऱ्या वर्षात मिळेल आणि आम्ही अजून अधिक जोमाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करू.